मुंबई : राज्यात मॉन्सून पावसाची प्रतिक्षा शेतकरी करत आहेत, दरम्यान मान्सून मात्र रखडल्याचे पाहायला मिळत आहे. २९ तारखेला केरळमध्ये दाखल झालेला मान्सूनचा प्रवास संथ गतीने चालू आहे. ३ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवलेला मॉन्सून हा पुढच्या ७ ते १० दिवसांमध्ये म्हणजेच १२ जूनपर्यंत राज्यात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतक-यांना काही दिवस अजून वाट पाहावी लागणार आहे.
राज्यात ३ जून पर्यंत मॉन्सूनचे आगमन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण तो कालावधी कधीच उलटून गेला आहे. या दरम्यान पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी मॉन्सूनच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. राज्यात येत्या ७ ते १० दिवसात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या सोबतच आता मॉन्सून अरब समुद्र, बंगालची खाडी, केरळ आणि तमिळनाडू आणि कर्नाटकातील काही भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. तर महाराष्ट्रात ७ ते १० दिवसात मॉन्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. पाऊस फार जोरदार नसेल, मध्यम ते कमी प्रमाणात कोकण, मध्य महाराष्ट्र घाट भागात पुढील २-४ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.