नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करायला पाहिजे पण त्यांच्या दौ-यात कुठे जायचे हा त्यांचा निर्णय असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. त्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होवोत आम्ही तयार असल्याचं सूतोवाचही पवारांनी यावेळी केले आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर न्यायालयाच्या आरक्षणाच्या निकालाआधी जाहीर झालेल्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याच्या कोर्टाच्या निर्णयावर पवारांनीचिंता व्यक्त केली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजाचा मोठा वर्ग सत्तेच्या बाहेर फेकला जाईल असं मत पवारांनी व्यक्त केले आहे. एखाद्या राज्यात नवं सरकार स्थापन झाले तर नवे निर्णय घेणे हे साहजिकच आहे. पण एखादे चालू प्रकल्प थांबवणे अयोग्य असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राज्यातील राजकीय बांधणी विस्कळीत झालेली नसून ज्यावेळी राज्यातील जनतेचा कौल घेण्याची वेळ येईल त्यावेळी सर्व व्यवस्थित होईल.
राज्यात दोनच मंत्र्यांच्या जीवावर कारभार
राज्यात दोनच मंत्र्यांच्या जीवावर काम चालले आहे. त्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे असे चालले आहे असे मत पवारांनी व्यक्त केले आहे. कोर्टाने काल स्पष्टीकरण देत ओबीसी आरक्षणाच्या आधी जाहीर झालेल्या निवडणुकामध्ये आरक्षण लागू होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्विचार करण्याची याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर हे सरकारचे अपयश म्हणत काहींनी शिंदे सरकारवर टीका केली होती.