मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात घेतलेली भूमिका महाराष्ट्रात राजकीय तापमान वाढवताना दिसत आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सा-यांचेच लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात पुन्हा रान पेटवण्यास सुरुवात केली आहे.
राज ठाकरे यांनी याबाबत एक पत्र लिहीले आहे. हे पत्र नागरिकांना घराघरांत जाऊन देण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले आहे. मात्र हे पत्र वाटप करणा-या मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.
भोंग्यांबाबत जनजागृती करणारे पत्र राज ठाकरे यांनी काढले असून ते नागरिकांपर्यंत घरोघरी पोचविण्याचे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केले आहे. घाटकोपरच्या असल्फा विभागात मनसेचे उपाध्यक्ष महेंद्र भानुशाली, शाखा अध्यक्ष राहुल चव्हाण आणि इतर पदाधिका-यांनी या पत्रांचे प्रथम मंदिरात पूजन केले.
मात्र ते वाटप करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र आपण हे पत्र घराघरांत पोहोचविणारच असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसैनिकांनी माहीम येथील मकरंद सोसायटीपासून मुंबईत हे पत्र नागरिकांच्या घरोघरी जाऊन वाटपास सुरुवात केली आहे.
यानुसार नवी मुंबईतील सिवूड येथे मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी पत्राचे वाटप सुरू केले. त्यांनी सोसायटीमध्ये जाऊन मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील मनसेकडील भोंगेविरोधी पत्राचे वाटप केले. मनसेमुळे महाराष्ट्र आणि देशभरात भोंग्यांच्या आवाजाविरोधात चळवळ सुरू झाली असून यामध्ये आता सर्वसामान्य नागरिकांनीही उतरावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केले आहे.
दरम्यान पोलिसांनी चेंबूरमधून काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. चेंबूरमध्ये काही मनसे कार्यकर्ते नागरिकांच्या घरी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्राचे वाटप करत होते. यावेळी या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मनसे कार्यकर्त्यांना आरसीएफ पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. विनापरवानगी पत्र वाटप केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे.