मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला असून, मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील ४० टक्के कमिशनवाले भाजपा सरकार लोकांनी घालवले. राज्यातील शिंदे सरकार तर त्यापेक्षा जास्त भ्रष्ट आहे, अशी घणाघाती टीका विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज केली.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव नाही, भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. अवकाळीच्या नुकसानीनंतर सरकारने विधानसभेत मदतीची घोषणा केली; पण अद्यापही मदत मिळालेली नाही. कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला अनुदान जाहीर केले; पण जाचक अटीमुळे ही मदतही शेतक-याला मिळाली नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्या वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे आणि शिंदे सरकार मात्र मोठ मोठे इव्हेंट करण्यात मग्न आहे, अशी टीका थोरात यांनी केली.
दोन दिवसांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. एकत्र लढून भाजपाचा पराभव करणे हा आमचा उद्देश आहे. ज्या जागा आमच्याकडे नाहीत; पण त्या मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरू. शिंदे-फडणवीस सरकारबद्दल राज्यात प्रचंड नाराजी आहे. जनता भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. आम्ही एकत्र लढून लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो, असे चित्र असल्याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे. या अपघातील मृतांची संख्या पाहून मन सुन्न झाले. अपघातात एकही बळी जाऊ नये, अशीच अपेक्षा आहे. अपघात रोखणारे महाकवच मोठा गाजावाचा करून आणले होते ते कोठे गेले? एवढा मोठा अपघात झाला त्याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित झाली पाहिजे. ओडीशा अपघातीची नैतिक जबाबदारी म्हणून रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी थोरात यांनी केली. १९५६ साली महबूबनगर रेल्वे अपघात झाला असताना तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. आजचा अपघात भयंकर आहे, जीवितहानी प्रचंड झाली आहे, त्याची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुळात रेल्वे मंत्री असतात कुठे? हाच प्रश्न आहे. देशात कुठेही रेल्वेला हिरवा झेंडा दाखवायचा असेल तर पंतप्रधानच असतात.