पुणे : रेल्वे प्रवासादरम्यान बॅग चोरी करणा-या सहा जणांच्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी आंतरराज्यातून दौंड तालुक्यात चोरी करत होती. या सहा जणांच्या टोळीला दौंड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून या सहा जणांच्या टोळीने दौंड परिसरात धुडगूस घातला होता. मात्र अखेर दौंड पोलिसांना त्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे.
या टोळीकडून ७ मोबाईल, ४८ नवीन सिम कार्ड, बॅग लिफ्टिंगसाठी कटर, ब्लेड, पक्कड, बनावट चाव्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या टोळीतील पाच आरोपी हे हरियाणाचे असून एक आरोपी दिल्लीचा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रकरण नेमके काय आहे?
सहा जणांच्या टोळीने दौंड परिसरात धुमाकूळ घातला होता. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या बॅग चोरी करत होते. बॅग चोरी केल्यानंतर सगळी टोळी फरार होत होती. या टोळीने दौंडमध्येच नाही तर राज्यात धुमाकूळ घातला होता. टोळीत एकूण सहापेक्षा अधिक लोक आहेत.
पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना ही टोळी दौंडमध्ये असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाच्या सहाय्याने दौंड शहरातील गोवा गल्ली, नेहरू चौक या ठिकाणाहून सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाबाबत पुढील सगळी करवाई मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयातील मुंबई-भाईंदर युनिट सात यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
यापूर्वी पुणे पोलिसांनीदेखील अट्टल चोराला जेरबंद केले होते. सहा लाख रुपयांचे वाहन चोरी करणा-या अट्टल वाहनचोराला खुळेवाडी विमाननगर परिसरातून अटक केली होती. त्याने चोरलेली सहा लाख रुपये किमतीची १३ वाहने जप्त केली होती. चंदननगर पोलिस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाल्याने आरोपीबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध सुरू केला.
आरोपी पुण्यातील चंदननगर परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी चक्रे हलवली. त्यानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले आहे. गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश माने यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पुणे-नगर हायवे पोलिस पथकाने नगर हायवेवर सापळा रचून आरोपीला पकडले होते.