मुंबई : राज्यात लवकरच पोलिस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जून महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. लवकरच यासंबंधीची जाहिरातदेखील काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पहिल्या टप्प्यात ७ हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.
कोरोना काळात राज्यातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेली दोन वर्ष कोणतीही पोलिस भरती झाली नव्हती. राज्यभरात लाखो तरुण पोलिस भरतीची तयारी करत आहेत. कित्येक महिन्यांपासून त्यांचे डोळे पोलिस भरतीकडे लागले होते. अखेर महाविकास आघाडीने कोरोना सरल्यानंतर उशिरा का होईना पण ७ हजार पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
५२०० पदांची भरती अंतिम टप्प्यात
राज्यातील विविध पोलिस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलिस कार्यालयांमधील २०१९ च्या भरती प्रक्रियेनुसार ५२०० पदांची भरती होणार होती. ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून निवड झालेले उमेदवार सेवेत रुजू होत आहेत. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस भरतीसंदर्भात माहिती दिली होती.