मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या खासगी डॉक्टरांचा विमा नाकारण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. डॉक्टरांना जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या सरकारला स्वत:च्या जबाबदारीचा विसर पडल्याचा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे पत्रात म्हणतात, ‘खासगी डॉक्टरांचं शिष्टमंडळ मला भेटलं. त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे. पण त्यांनी सरकारी अनास्था सांगितली, त्याने माझं मन विष्णण्ण झालं. कोरोना संसर्गाच्या काळात सरकारने खासगी डॉक्टरांना दवाखाने बंद न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉक्टरांनी व्यवसायाशी बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णसेवा सुरुच ठेवली.
कोरोना काळात सेवा बजावणा-या खासगी डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू होऊनही केवळ खासगी सेवेत असल्याचे कारण देत त्यांना विमा कवच देत नाहीत. याबाबत अलीकडेच डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने राज यांची भेट घेतली होती. त्याचा दाखला देत राज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून खासगी डॉक्टरांनाही विमा सुरक्षा देण्याची मागणी केली. सरकारी किंवा खासगी सेवेतील सर्व डॉक्टर्स, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळात विम्याचे कवच असेल, त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला विम्यातून ५० लाख दिले जातील, असे परिपत्रक राज्य सरकारनेच काढले होते.
सरकार जर डॉक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देणार असेल, मात्र त्याचवेळी स्वत:ची जबाबदारी विसरणार असेल तर हे चुकीचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याप्रकरणी लक्ष घालून खासगी सेवेतील डॉक्टरांनाही योग्य न्याय द्यावा.