अहमदनगर : उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवायला हवे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. मात्र वाचाळपणा कराल तर एकटे पडाल, अशा शब्दांत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या बुलडाण्याच्या सभेतील वक्तव्याचा समाचार घेतला.
जनाची नाही, मनाची तरी ठेवा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुलडाणा येथील सभेत केली होती. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलताना भान ठेवायला हवे. ते एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत. सत्ता गेल्याचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. आपण जे बोलतोय त्याचे भान त्यांना नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
अडीच वर्षे सत्तेत असताना आपल्याला शेतक-यांची आठवण झाली नाही. आपण दिलेल्या घोषणांची सत्तेत असताना पूर्तता केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडू नये, अशा सूचना अगोदरच दिल्या आहेत. आपण मात्र बांधावर जाऊन वीज कापण्याचे काम केले. पातळी सोडून जर वाचाळपणा करत राहिलात तर भविष्यात ते एकटेच राहतील, असा टोला विखे पाटलांनी लगावला.
गेल्या अडीच वर्षांत सरकार नावाची व्यवस्थाच राज्यात शिल्लक नव्हती. कोविडमध्येही लोक वा-यावर होते. नंतरही कुठली मदत नाही. केंद्र सरकारचा हस्तक्षेप नसता तर राज्याची अवस्था काय झाली असती? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी वास्तवाचे भान ठेवायला हवे, असा सल्ला विखे पाटलांनी शेतकरी आत्महत्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंना दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपला हात अगोदरच दाखवलाय. कोणाच्या पाठीवर आणि कोणाच्या गालावर पडला हे सांगायची गरज नाही. त्यांचे भविष्य ठरलेले आहे. आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले हे त्यांचे भविष्य होते. जनतेने राज्यातील भविष्य ठरवलेले आहे आणि पुढची वीस वर्षे शिंदे-फडणवीस सरकारच राज्यात सत्तेत राहणार, असा दावा राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.
वाळूमाफियांकडून जीविताला धोका असल्याने बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या तहसीलदारांनी जिल्हाधिका-यांकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. याची गंभीर दखल घेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रशासनाला कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यातील वाळू तस्कर आणि खानमाफीयांवर लगाम लावलाआहे म्हणून काही आमदारांचाही थयथयाट झाला आहे. वाममार्गाने पैसा मिळवून त्याचा उपयोग जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी होत आहे. बीडच्या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून वेळप्रसंगी मोक्का लावला तरी हरकत नाही, अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली.