मुंबई : विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी आजपासून कामबंद आंदोलन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरसुद्धा लेखी आश्वासनाची मागणी करण्यात आली. त्यामुळे आज विद्यापीठ, महाविद्यालयात कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. बैठकीत सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना, ५८ महिन्याची थकबाकी, १४१० कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे आंदोलन करण्यात आले आहे.
मुंबईत शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने मुंबईतील आज अनेक महाविद्यालय बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांना फटका बसला. मागण्या लेखी स्वरुपात मान्य होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने पवित्रा घेतला आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठे त्यासोबतच महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने आज एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेले.
बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या पदाधिका-यांची बैठक झाली. मात्र जोपर्यंत मागण्या लेखी मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने घेतला. त्यामुळे आज अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन पुकारले. बारावी प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना त्यासोबतच लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने याचा फटका पदवी त्यासोबतच बोर्डाच्या परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना बसू शकतो.