मुंबई : प्रतिनिधी
पीक विमा कंपन्या शेतक-यांना चांगली भरपाई देत असून उर्वरित ५०३ कोटी रुपयांची रक्कम पुढील १५ दिवसांत शेतक-यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. कृषी विभागांतील बदल्यांना स्थगिती दिलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले. नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विम्याबाबत तपशीलवार माहिती दिली. पीक विम्याचे ६३ लाख ११ हजार २३५ लाभार्थी आहेत. ५० लाख, ९८ हजार ९९ शेतक-यांना २ कोटी ३५६ लाख भरपाई मिळाली आहे. अद्याप ५०३ कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम प्रलंबित असून ती पुढील १५ दिवसांत जमा होईल, तर सरकारने पीक विम्यासाठी केवळ एक रुपयांत नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजवर कुठल्याही अर्थमंत्र्याला हे सुचले नाही, तो निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी ३ हजार ३१२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांना २ हजार ३४२ कोटी रुपये बँक खात्यात जमा केले असल्याचे अब्दुल सत्तार या वेळी म्हणाले तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील २ टक्केही खर्च झाले नाही, असे म्हणणे बरोबर नाही. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ६५ कोटी, ८८ लाख रुपये म्हणजे ८० टक्के पैसे खर्च झाले आहेत. १०८ कोटी रुपयांचा दुसरा टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून ३१ मार्चपूर्वी हा निधी खर्च केला जाईल. या निधीतून ५८ कोटी, ४८ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. चर्चेला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी हातातील कागद वाचत भाषण करण्यास सुरुवात केली. त्यावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांनी वाचून उत्तर देऊ नये, असे त्यांनी सांगितले. तेव्हा, नावे चुकू नये म्हणून वाचून दाखवत असल्याचे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिले.