मुंबई : बंडखोर नेत्याच्या सुरक्षेस असलेल्या पोलिसांवर कारवाई होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. चारही मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी याबाबत वॉकीटॉकवर माहिती दिली होती. तर एकनाथ शिंदे सुरतच्या दिशेने जात असल्याची पूर्ण माहिती कंट्रोल रूमला देण्यात आल्याचे समोर आले आहे. शिंदे आपल्यासोबत पाच ते सहा आमदारांना घेऊन गुजरातला जात असल्याची माहिती गृहमंत्र्यांना होती असे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या घडामोडीत पोलिसांचा दोष आढळून येत नसल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे. शिंदेंनी रातोरात्र सेनेचे नेते फोडले आणि नवा गटाचे शिवसेना असल्याचा दावा केला. सध्या ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपशासित आसाम राज्यात शिंदेंच्या गटाला आश्रय देण्यात आला आहे. यानंतर राज्यात नवे सरकार येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार बंडाची तयारी करत असताना याची माहिती इंटेलिजन्सला पोहोचली नाही, याची शक्यता कमी आहे.
सेनेत फोडाफोडी होणार. आमदार सूरतला जाणार आणि महाविकास आघाडी सरकारची कोंडी होणार, यासंबंधी संभाषणे झाली असणार आणि त्याची कानोकान माहिती कोणत्याही पोलिस यंत्रणेला लागली कशी नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, रातोरात एकनाथ शिंदेंसह अन्य मंत्री आणि आमदारांनी सरकारी सुरक्षा सोडली. महाराष्ट्राच्या सिमेवरच सर्वांनी सुरक्षा रक्षकांना माघारी पाठवले. मात्र, यावेळी सुरक्षा रक्षक आणि पोलिस अधिकारी काय करत होते, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्यामुळे गृहखात्याला याची माहिती होती असे समोर आले आहे. आता संशयाची सुई वळसे पाटील यांच्याकडे गेल्याचे चित्र आहे.
संबंधीत अधिका-यांवर कारवाईची मागणी
राजकीय मंडळी महाराष्ट्र सोडून कुठेतरी जात होती. एकाच वेळी एवढे मोठे बंड घडत होते. याची कुणकुण सरकारी यंत्रणांना लागली कशी नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी संबंधित अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र या प्रकरणात आता महत्वाची माहिती समोर यÞेत आहे.