नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय पेचप्रसंग ओढवला आहे. त्यांच्या बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. ‘महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच’, असे उदयनराजे स्पष्टच बोलले. उदयनराजे दिल्लीत बोलत होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात मला धक्कादायक असं काही वाटत नाही. दोन वर्षांपासून खदखद सुरू आहे. ज्यावेळी वेगवेगळे लोक एका ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र येतात तेव्हा त्यांना कुठलं आमिष दाखवण्याची गरज नसते. पण सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या आयडॉलॉजीचे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांना सत्तेसाठी तारेवरची कसरत करावी लागते.
हे लोक फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. त्यामुळेच ही परिस्थिती आहे. कारण यांची विचारधारा वेगवेगळी आहे. ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी त्यांनी विचार करायला हवा होता, टिकलो तर किती टिकणार? लोक आज बोलून दाखवत आहेत की पक्षश्रेष्ठींकडून वेळ दिला जात नाही, कामं होत नाहीत.
असं होत असताना ५-६ महिन्यांच्या कालावधीत आमदार-खासदारकीची पाच वर्षे टर्म असते, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या टर्म संपत आहेत. सर्वांना निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे. अशावेळी आपण विचार केला तर शिवसेना आणि भाजपच्या मतदारसंघात विरोधक कोण आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी. त्यामुळे ही समीकरणं जुळणार नव्हतीच.