मुंबई : औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची घोषणा करतील, असा दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता.
मात्र दुस-याच दिवशी खैरेंच्या दाव्याची भाजप नेते तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी हवा काढून घेतली आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नाही, असे कराड म्हणाले.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कराड म्हणाले की, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामकरणाचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला नसून, काही जण केवळ हवेत बाता मारत आहेत.
कोणत्याही शहराच्या नामकरणाचा प्रस्ताव आधी राज्य विधानसभेत मंजूर करून केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवावा लागतो. कारण, शहराचे नाव बदलायचे असेल तर त्यास रेल्वे, हवाई वाहतूक, पोस्ट खाते आदी खात्यांची ना हरकत लागते.
परंतु माझ्या माहितीनुसार राज्य सरकारने अद्याप प्रस्तावच पाठवलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी काही मंडळी चुकीची माहिती देत असावी, असे कराड म्हणाले.