नवी दिल्ली : राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यामधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अर्णव गोस्वामींना झालेल्या अटकेवरून दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका नेत्याने पुन्हा एकदा ठाकरे सरकारबाबत मोठा दावा केला आहे. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्थापन केलेल्या एन.एन. वोहरा समितीने दिलेला अहवाल प्रसिद्ध केल्यास लगेचच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पडेल असा दावा भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांनी केला आहे. तसेच हा अहवाल तातडीने प्रसिद्ध केला जावा, अशी मागणी ही केली आहे.
वोहरा यांच्या नेतृत्वाखालील समितीने एक १०० पानांचा अहवाल तयार केला होता. त्या अहवालामध्ये दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात गुन्हेगारांशी राजकीय नेत्यांच्या आणि नोकरशहांच्या असलेल्या संबंधांबाबत खळबळजनक माहिती होती. या अहवालातील केवळ १२ पानेच प्रसिद्ध झाली होती. दरम्यान, या नेत्यांची माहिती कधी प्रसिद्ध केली जाईल, अशी विचारणा उपाध्याय यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पीएमओला टॅग करत उपाध्याय यांनी ट्विट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने वोहरा समितीच्या अहवालावर कारवाईची सूचना केंद्र सरकारला दिली होती. मात्र २३ वर्षे होत आली तरी आतापर्यंत वोहरा समितीच्या अहवालावर कुठलीही कारवाई झाली नाही. तसेच हा अहवाल सार्वजनिकही केलेला नाही,’असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अहवालातील ठळक मुद्दे
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर नरसिंहराव सरकारने एन.एन. वोहरा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. समितीमध्ये रॉ आणि आयबीचे सचिव, सीबीआयचे संचालक आणि गृहमंत्रालयाच्या सचिवांचाही समावेश होता. अनेक नेते आणि नोकरशहांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याची खळबळजनक माहिती या अहवालातून सरकारला देण्यात आली होती. हा अहवाल पूर्णपणे प्रसिद्ध करण्यात आला नाही. मात्र १९९५ मध्ये १०० पानी अहवालामधील १२ पाने प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामधून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मोठे अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी असलेल्या संबंधांबाबत सूतोवाच केले होते.
अमेरिकेतील अधिवेशनामध्ये लातूरच्या डॉ.अनुजा कुलकर्णी शोध निबंध सादर करणार