मुंबई : राज्यातील सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार, दि. ८ जून रोजी दु्पारी एक वाजता लागणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. यंदा कोरोनाची साथ ओसरल्याने दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर होणार आहे.
या अगोदर राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल येत्या काही दिवसात जाहीर होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानंतर आज बारावीचा निकाल बुधवारी लागणार असल्याचे सांगितले. दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचे नाव देऊन आपला निकाल बघता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी खालील वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org