सातारा: राज्यसभा निवडणुकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अपक्षांना त्यांना बाजूने वळवण्यात यशस्वी ठरले आणि त्यांनी धनंजय महाडिकांना निवडून आणलं. तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे उद्धव ठाकरेंची नाराजी होणं सहाजिक आहे, असं वक्तव्य जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं.
विधानसभेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे मिळून १५३ एवढी मते आहेत. मात्र, आम्हाला मिळालेल्या पाठिंब्यावर आम्ही १६३ पर्यंत आहोत. आम्हाला या आधिसुद्धा मदत केलेल्या अपक्षांमधील ४ ते ५ लोकांच मत दुस-या बाजुला गेल्याचं दिसतय. परंतु, यात जास्त काळजीचा विषय आहे, असं वाटत नसल्याचं मत जयंत पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात व्यक्त केलंय.
आमच्यात कोणताच अंतर्गत वाद नाही. उलट आम्हाला अपक्षांचा पाठिंबा मिळाला. त्यातल्या चार ते पाच लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही, असं दिसतंय. राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची नाराजी होणं सहाजिक आहे. त्यांचा दुसरा उमेदवार निवडून येणे गरजेचे होते. मात्र, तो आला नाही, झालेल्या मतदानाबाबत त्यांना खुलासा झाला असेल. मात्र, याबाबत त्यांचं आणि माझं बोलणं झालं नाही, असं सुद्धा जयंत पाटील यांनी सांगितलं.