नवी दिल्ली : ‘उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी काही चुकीचं केलं असतं, तर मीच माफीची मागणी केली असती’, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने खासदार उदयनराजे यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्याचे काल समोर आले होते. या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक संघटना आणि नेत्यांकडून नायडू यांचा निषेध नोंदवला जात आहे. यावर आता उदयनराजे भोसलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले, ‘सभापती व्यंकय्या नायडू यांनी जे राज्यघटनेत नाही त्यावर फक्त आक्षेप घेतला. माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं आहे. महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता.’
‘बाळासाहेब मोठे वाटत असतील तर शिवसेनेने ठाकरे सेना असं नाव ठेवावे’, असंही उदयनराजे भोसलेंनी सांगितले. ‘संजय राऊतांना काहीही उत्तर देणार नाही. संजय राऊत आमच्याकडे दाखले मागतात आणि आता ते आम्हाला विचारत आहेत’, असे उदयनराजे म्हणाले. ‘शरद पवार तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा, जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही हात जोडून कळकळीची विनंती करतो’, अशी विनंतीही उदयनराजे भोसलेंनी केली.
‘बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे. शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आहे, यावर आक्षेप का घेतला नाही?’, असा प्रश्नही यावेळी उदयनराजे भोसलेंनी उपस्थित केला.
Read More संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वॅब तपासणी करावी : आ. राजूरकर यांचे आवाहन