पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या खडकवासला धरण साखळीतील पाणी साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पडत असला तरी सध्या चारही धरणांत मिळून केवळ ३.२९ टीएमसी पाणी साठा आहे. गत वर्षी हाच साठा ७.८४ टीएमसी होता. पाऊस लांबल्यास पाणीटंचाईचे संकट ओढावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यंदाचा उन्हाळा आजवरचा १२२ वर्षांमधील सर्वात प्रखर होता. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही जास्त झाले. राज्यात यंदा पूर्ण मॉन्सून पावसानेही पाठ फिरवली. परिणामी, धरण साठ्यांत अद्याप वाढ झालेली नाही.