पुणे : राज्यात अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात दोन दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर परभणी, लातूर, हिंगोलीला ऑरेंज अलर्ज जारी करण्यात आला आहे.
राज्यात अवकाळी पावसाचा धडाका सुरू आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाच्या पारा देखील ४० अंश सेल्सीअसपेक्षा अधिक आहे. मात्र सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात होते. काल (गुरुवार) राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला. काल पुण्यात देखील अनेक भागात पाऊस पडला. सोसाट्याच्या वा-यासह गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊण तास धो-धो बरसला. पावसामुळे भूमकर चौकातील भुयारी पुलात तब्बल गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याने आयटीयन्ससह स्थानिक रहिवाशांना मोठ्या मन:स्थापाला सामोरे जावे लागले. अनेक वाहने या पाण्यात बंद पडली होती.
घोटीसह परिसरात जोरदार पावसाने हजेरी
प्रचंड उकाडा व नंतर काळे ढग भरून आल्याने दुपार नंतर पावसाने सुमारे एक तास हजेरी लावल्याने गटारी तुडुंब भरून मुख्य मार्गांवर पाणी साठल्याचे जागोजागी दिसून आले. अचानकपणे पावसाने लावलेली हजेरीमुळे बाजारात दाखल शेतकरी बांधवांची देखील हाल झाल्याचे पाहायला मिळाले.