कोलकाता : आज पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे. यातच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांनी बंगालमधील जनतेला उद्देशून एक व्हीडीओ संदेश जारी केला आहे. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत राहूल गांधी म्हणाले, ममता बॅनर्जी यांंनी बंगालमध्ये स्वच्छ सरकार चालवले असते आणि ध्रुवीकरणाचे राजकारण केले नसते, तर आज राज्यात भाजपचा रस्ता मोकळा झाला नसता. राहुल गांधी यांच्या या विधानाकडे भाजप नेते आणि कार्यकर्ते भाजप विजयाची भविष्यवाणी म्हणून बघत आहेत.
या व्हीडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले बंगाली जनतेला संदेश देताना राहुल गांधी म्हणाले, ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. भाजप निवडणुकीची चोरी करते. भाजपने हरियाणा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात निवडणूक चोरी केली आहे. एसआयआर ही निवडणूक चोरी करण्याची पद्धत आहे. बाजप आणि काँग्रेसच्या विचारधारेचा देशात संघर्ष सुरू आहे. बंधूंनो भारत जोडो यात्रेत आम्ही नफरत की बाजार में मुहोब्बत की दुकान खोलना है, हा एक संदेश दिला होता. भाजप, बंगालची संस्कृती, भाषा आणि इतिहासाच्या विरोधात काम करते.
संविधान संपविण्याचा घाट
राहुल गांधी पुढे म्हणाले, भाजप नेते म्हणतात की, एक देश, एक भाषा आणि एक धर्म. पण, या देशात खूप सा-या भाषा आहेत, वेगवेगळे धर्म आहेत आणि वेगवेगळ्या विचारधारा आहेत. आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत आणि भाजप संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे.
















