नांदेड : काल दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:००, दुपारी ३:००, सायंकाळी ५:०० व रात्री ९:०० वाजता नायगाव तालुक्यातील टाकळी (बु) या गावात भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली होती. त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता या आवाजाची/ धक्क्याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे आढळून आले.
तरीही अजून सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना देखील माहिती घेण्यास सांगितले होते. त्यानुसार आज दि. १३ ऑक्टोबर रोजी डॉ. विजयकुमार यांनी माहिती घेतली असता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागात सदर धक्क्यांपैकी दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.५७ व सायंकाळी ८.५८. या दोन धक्क्यांची नोंद झाली असून या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे १.९ व २.३ एवढी नोंदविण्यात आली असून याचा केंद्रबिंदू खैरगांव गावाच्या आसपास असल्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉक्टर टी. विजयकुमार यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे.
सदर धक्का हा अतिसौम्य प्रकारचा आहे व अशा पद्धतीचे कंपन हे अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत होणा-या पुनर्भरण अथवा उपसा यामुळे निर्माण होणा-या हायड्रोस्टॅटिक दबावामुळे होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आल्याचे डॉ. टी. विजयकुमार यांनी जिल्हा प्रशासनास कळविले आहे. ही सामान्य बाब असून प्रतिवर्षी ब-याच भागात असे जाणवते. गूढ आवाज येणे ही स्थानिक स्वरुपातील बाब असल्याचे यापूर्वी देखील निर्दशनास आले आहे. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत तहसीलदार नायगाव यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे.
तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्ट ने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला (०२४६२) २३५०७७ या क्रमांकावर संपर्क करून कळवावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जनतेला केले आहे.

