पुणे : प्रतिनिधी
मीरारोडच्या घटनेचा संदर्भ देत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, पोलिस आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. ‘मीरा-भाईंदर परिसरात निवासी सोसाट्यांमध्ये सार्वजनिक स्वरूपात बकरे आणून धार्मिक कारणास्तव पशुबळी देण्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशा प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्यातही काही समाजविघातक, कट्टर प्रवृत्तीचे घटक सार्वजनिक ठिकाणी सोसायट्यांमध्ये किंवा रहिवासी भागांमध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता, आरोग्याचे निकष न पाळता सार्वजनिक ठिकाणी असे कार्यक्रम घेणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे’ असे माधुरी मिसाळ यांनी पत्रात लिहिले आहे.
‘पुणे हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे’ असे माधुरी मिसाळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. पुण्यातील सार्वजनिक ठिकाणी आणि सोहळ्यांमध्ये अनुचित कृत्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याबाबत पत्रातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांशी गैरवर्तन
धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांशी गैरवर्तन व अश्लील वर्तनाच्या घटना वाढत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. महिलांशी छेडछाड, अश्लील कृत्ये आणि गैरप्रकार करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिस, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
















