नवी दिल्ली : काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत मोठे राजकीय वक्तव्य केले. पुढील एका वर्षात पंतप्रधान मोदी यांचे सरकार कोसळले, असा दावा त्यांनी केल्याचे काँग्रेस सूत्रांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक परिस्थिती आणि देशात वाढत असलेला आर्थिक असंतोष हे यामागील प्रमुख कारण ठरतील, असे राहुल गांधी यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील आर्थिक आव्हाने आणि जनतेतील वाढती नाराजी याचा परिणाम आगामी काळात हिंदुस्थानच्या राजकारणावर स्पष्टपणे दिसून येईल, असे राहुल गांधी यांनी बैठकीत नमूद केले. सध्याच्या परिस्थितीत जनतेत असंतोष वाढत असून त्याचे राजकीय परिणाम भविष्यात दिसतील, असा त्यांचा दावा होता.
‘अल्पसंख्याक’ शब्दाचा वापर
बैठकीदरम्यान काही नेत्यांनी ‘मुस्लिम’ या शब्दाऐवजी ‘अल्पसंख्याक’ हा शब्द वापरण्याची भूमिका मांडली. मात्र राहुल गांधी यांनी त्यास असहमती दर्शवली. अन्याय होत असलेल्या कोणत्याही समाजघटकाच्या बाजूने काँग्रेसने निर्भीडपणे उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. तो हिंदू असो, दलित असो, सवर्ण असो, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन किंवा बौद्ध-जैन असो, काँग्रेसने सर्वांच्या अधिकारांसाठी आवाज उठवला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.
इतर नेत्यांचा बोलण्यास नकार
याच बैठकीत काही नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे तक्रार मांडत अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर ते स्वत: स्पष्टपणे भूमिका घेत असले तरी पक्षातील इतर वरिष्ठ नेते अशा विषयांवर बोलण्यास टाळाटाळ करतात, असे सांगितले. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच पक्षातील इतर नेत्यांनीही अल्पसंख्याकांच्या मुद्यांवर अधिक ठामपणे भूमिका मांडली पाहिजे, असा सल्ला या नेत्यांनी दिला.
















