नांदेड : प्रतिनिधी
शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेदांतनगर भागातील एका महिलेच्या घरात दरोडा टाकल्याची घटना भर दिवसा दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता घडली. यावेळी सदर महिलेने ११२ क्रमांकावर मदत मागताच पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद देत राजस्थानच्या पाच जणांच्या टोळीला पकडून ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस ठाणे विमानतळच्या हद्दीत वेदांतनगर भागात विकास शर्मा यांचे घर आहे. विकास शर्मा हे व्यावसायीक आहेत. त्यांच्या घरात दि. १० रोजी फक्त पत्नी व एक छोटा मुलगा असे दोघे जण होते. सकाळी १०.३० वाजता कांही दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले आणि काही जण घराबाहेर लक्ष ठेवून होते. पण राज्य शासनाने आणि पोलीस विभागाने जारी केलेली मदतीच्या ११२ या क्रमांकाहून त्या महिलेने फोन केला. दरम्यान चोरट्यांनी त्या महिलेच्या अंगावरून सोन्याचे मनी मंगळसुत्र बळजबरीने काढून घेतले होते. सोबत अजून काही साहित्य चोरीला गेले. ११२ क्रमांकावर काम करणारे पोलीस अंमलदार शिवराज गोणारकर आणि बोरकर यांनी तत्काळ प्रतिसाद देत वेदांतनगर गाठले. सोबत तेथील लोकांनी सुध्दा पोलीस विभागाला प्रतिसाद देत दरोडेखोरांना करण्यात मदत केली. राजस्थानच्या या दरोडेखोरांच्या टोळीतील प्रदिप शंकरलाल स्वामी वय १९ वर्षे, पवनकुमार रामुराम जाठ वय २४ वर्षे, राजकुमार सुरेशकुमार जाठ वय २४ वर्षे, पंकज शंकरलाल स्वामी वय २१ वर्षे, मनीष नेमीचंद सेन वय २१ वर्षे सर्वांचा व्यवसाय फरशीचे काम रा. नवसल तहसिल दात्तारामगड जिल्हा सिकर या पाच जणांकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसुत्र, पेंडालसह किमंत ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
दरोडा प्रकरणी सदर आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात अनेक ठिकाणी या आरोपींनी गुन्हे केल्याचा संशय पोलिसाना आहे., असे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगतीले. ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अशोक अनंत्रे, सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके, पोलीस अंमलदार वाणी, मुंजाजी चावरे, खंडागळे, शरदचंद्र चावरे, मनोज परदेशी, रमेश सुर्यवंशी, बालाजी कदम यांनी केली. महिलांची छेडछाड करुन दिवसा ढवळ्या चाकूचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार घडत असल्यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र अवघ्या काही तासात पोलिसांनी या घटनेतील दरोडेखोरांना पकडल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.