नांदेड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला नांदेड जिल्ह्यात उधान आले आहे. परंतू या चर्चांना अशोकराव चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. मी काँगे्रस सोडण्याचा असा कुठलाही निर्णय घेतला नाही, कोण करीत आहे चर्चा, या चर्चांना कोरणतेच महत्त्व नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात काही दिवसापुर्वी अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेतील बंडानंतर राज्यातील आघाडी सरकार पायउतार होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. नव्या सरकार स्थापनेवेळच्या बहुमत चाचणीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे उशीरा पोहचले होते. यामुळे ते मतदान करू शकले नव्हते. त्यांच्यासोबत इतर ४ ते ५ आमदार बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते.
दरम्यान बहुमत चाचणीनंतर सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या पाठीशी असणा-या अदृश हातांचे आभार असे वक्तव्य केले होते. यावरून नाराज झालेल्या हायकंमाडने पक्षविरोधी कार्यवाही केल्याप्रकरणी काँग्रेसने अशोक चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तेव्हापासून अशोकराव चव्हाण पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या चर्चेच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यात राजकीय भुंकप होतो की काय याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
चव्हाणांनी दिला पूर्णविराम
गत काही दिवसांपासून काँगे्रस पक्षातील अनेक कार्यकर्तेच चव्हाण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा करीत आहेत. या सर्व चर्चांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तुर्त पुर्णविराम दिला आहे. पक्ष सोडण्याच्या या चर्चांना काही महत्त्व नाही. कोण करत आहे चर्चा, मी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
अशोक चव्हाण हे ८ डिसेंबर २००८ ते ११ नोव्हेंबर २०१० अशा जवळपास दोन वर्षांच्या काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २००८ साली मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही ते मंत्री होते. चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.