किनवट : तालुक्यातील मौजे घोटी येथील शेतात सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी चक्क सरते हातात धरून मूग पेरणी केली. हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन निमित्त कृषि विभाग पंचायत समितीच्या वतीने बांधावर वृक्षारोपन व शेतात पेरणी कार्यक्रम आयोजित केला होता.
यानुषंगाने सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जि. प. नांदेडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी रेखा काळम पाटील, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी तालुक्यातील मौजे घोटी शिवारातील प्रज्ञा सचिन येरेकर यांच्या शेतात बांधावर सिताफळ , करवंद व इतर पन्नास वृक्षांची लागवड केली. तसेच या सर्व अधिका-यांनी औताच्या मागे सरते (चाडी ) हातात धरून मूग पिकाची पेरणी केली.
किटक व बुरशी पासून बी-बियाणांचे संरक्षण व जीवाणू वाढ करून २० टक्के उत्त्पन्न वाढ करण्यासाठी पेरणीपूर्वी करावयाच्या बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक कृषि सहायक सुहास गिरे यांनी दाखविले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे सांख्यिकी अधिकारी सुधीर सोनवणे, हदगावचे बाल विकास प्रकल्पाधिकारी उमेश मुदखेडे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे,
बाल विकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड, पंचायत समितीचे कृषि अधिकारी शिवराम मुंडे, सिकंदर पठाण, अभियंता सचिन येरेकर, उत्तम कानिंदे, अॅड. सुनिल येरेकर, अजय कदम पाटील, राहुल पाटील, रामदास वाढई, मारोती मेश्राम, ग्रामसेवक अंबोरे, तलाठी पांढरे, कृषि सहायक सुजाता कानिंदे आदिंची उपस्थिती होती. वरील सर्व अधिकार्यांनी प्रारंभी पंचायत समिती परिसरात बांबू लागवड व घोटी येथील बिरसामुंडानगर जवळील स्मशानभूमीत वृक्षलागवड केली.