नांदेड : भाजप सरकारच्या काळात मराठवाडा, विदर्भ यासह अन्य मागास भागाचा विकास करण्याचा अजेंडा होता. त्यामुळे तत्कालीन काळात अनेक मोठे प्रकल्प सुरु झाले. परंतु सध्याच्या आघाडी सरकारकडे मराठवाड्याच्या विकासाचा कोणताही अजेंडा असल्याचे दिसत नाही. यामुळे मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे सोमवारी सभा झाली यावेळी ते बोलत होते. सभेस केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. तुषार राठोड, आ. भीमराव केराम, आ. राजेश पवार, माजी आ. बापूसाहेब गोरठेकर, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, सुभाष भालेराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकट पा. गोजेगावकर, संतुकराव हंबर्डे, वैद्यकीय आघाडीचे डॉ. अजित गोपछडे, भाजप महिला आघाडीच्या महानराध्यक्षा मिनल खतगावकर यांची उपस्थिती होती.
यावेळी पदाधिकारी, पदाधिका-यांना मार्गदर्शन करतांना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या निवडणुकीत भाजपचे नेते कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या शिफारसीवरुन शिरीष बोराळकर यांचे नाव दिल्लीला पाठवण्यात आले ते अंतिम झाले. या निवडणुकीचे मुंडे यांनी अत्यंत चोख नियोजन केले होते. परंतु दुर्दैवाने फार्म भरण्याच्या दिवशी मुंडे यांचे अपघाती निधन झाले. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह संपला परंतु बोराळकरांचा निसटता पराभव झाला. याचा वचपा काढण्याची संधी चालुन आली आहे. ही निवडणूक सर्वांनी मनावर घेतली आहे. त्यामुळे विजय निश्चीतच होईल. देशात कोरोनाच्या संकट काळात जाहिर झालेल्या लॉकडाऊ नमुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती.
परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिक, मजूर, शेतकरी, उद्योजक या सर्वच घटकांना खंबीरपणे साथ देवून मदत केली. यामुळे मोदी हे कर्मयोगी ठरले आहेत. भाजपने बिहारसह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश येथे सत्ता आणली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादीच्या बोलघेवड्या नेत्यांनी सर्वसामान्यांना मदत करण्याऐवजी मोदींवर टिका केली. भाजप सरकारच्या काळात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व इतर भागातील विकासाचा अजेंडा होता. मराठवाडा सुजलाम, सुफलाम करण्यासाठी वॉटर ग्रीड योजना आणण्यात आली परंतु या सरकारने ती थंडबस्त्यात टाकली आहे. अनेक प्रकल्प बंद केले आहेत. मागच्या निवडणुकीत जनतेने भाजपला निवडून दिले मात्र आपला मित्र बेईमान निघाला. त्याने दुस-यासोबत घरोबा केला अशी टिका सेनेचे नाव न घेता केली. मराठवाड्याचा विकास करायचा असेल तर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिरीष बोराळकर यांना विजयी करुन आघाडी सरकारला जागा दाखवा असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.
भाजपच्या वतीने वीज बिलांची होळी