नांदेड : सर्व विभागांच्या समन्वयातून श्रीक्षेत्र माहूरगडचा विकास करण्यात येईल. लवकरच माहूरसंदर्भात मुंबई येथे विषेश बेैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी नांदेड येथे दिली.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक शनिवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी २०१० मध्ये ७९ कोटी रूपयांच्या मूळ आराखड्यास मान्यता दिलेली आहे. या संदर्भात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अधिका-यांकडून आढावा घेतला.
या आराखड्यात धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक, पर्यटन, वाहतूक, पायाभूत सुविधा, इतर आधारभूत पायाभूत सुविधा विकसीत करण्याचा अंर्तभाव केलेला आहे. याचबरोबर पुरातत्व, जलसंधारण, पाणी पुरवठा, वन विभाग, नगरपंचायत अशा अनेक विभागांच्या माध्यमातून माहूरगड विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून या कामांना चालना देण्याच्या दृष्टीने लवकरच मंत्रालय पातळीवर विशेष बैठक सर्व संबंधित विभाग प्रमुख व मंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊन याला चालना देऊ, असे प्रतिपादन चव्हाण यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात झालेल्या या आढावा बैठकीस आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाशा धोंडगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.