अधार्पूर : घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असताना वधूपित्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना अर्धापूर शहरात घडली.हृदय हेलावून टाकणारी ही घटना मंगळवारी सकाळी घडली. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वाघजी सखाराम लिंगायत (४५ वर्षे रा.चोरंबा) हे अर्धापूर शहरातील व्यंकटराव साखरे यांच्याकडे सालगडी म्हणून कामाला होते. वाघजी मंगळवारी सायंकाळी ८ वाजता दैनंदिन वस्तू खरेदीसाठी सायकलवर शहरात जात असतांना अर्धापूर शहरातील कृषी कार्यालयासमोर पाठीमागून भरधाव वेगाने येणा-या ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी महामार्ग, अधार्पूर पोलीस यांनी धाव घेतली व मयतांचे पार्थिव पुढील सोपस्कारासाठी ग्रामीण रुग्णालय अधार्पूर येथे पाठविण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. वाघजी लिंगायत यांची मुलगी नेहाचा नुकताच साखरपुडा झाला. पुढील महिन्यात तिच्या लग्नाची तारीख काढणार होते. त्यामुळे घरात नेहाच्या लग्नाची तयारी सुरु झाली होती. अशी लगबग सुरू असताना वधुपित्याचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान शहरात अवजड वाहनास प्रवेश बंदी आहे. परंतु बंदी झुगारून दररोज शेकडो वाहने शहरात येत आहेत. त्याचा सर्वसामान्यांना त्रास होत असून अशा अपघातात निष्पाप लोकांचा बळी जात आहे.