नांदेड : मी नगरसेवक म्हणून हे माझ्या प्रभागात आपले कुटुंब समजून काम करत होतो . लोकसेवा करत होतो . विधानसभेला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ माझे अवघे कुटुंब झाले आहे . त्यामुळे कुटुंबातील एक कर्ता व्यक्ती म्हणून या मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहोत.
जनतेचा आशीर्वाद, जनतेच्या शुभेच्छा हेच आमच्या कामाची ऊर्जा असून आयुष्यात आगामी काळातही सर्वसामान्यांची सेवा करत राहण्याचा आम्ही विडा उचलला असल्याचे आज आ. बालाजी कल्याणकर आणि सौ.संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांनी प्रकट मुलाखतीतून व्यक्त केले. आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात गेल्या दोन दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक ३० जून रोजी प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळ पैठणीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील हजारो महिला भगिनींची उपस्थिती होती. त्यानंतर दिनांक ३१ जून रोजी सायंकाळी आमदार बालाजीराव कल्याणकर आणि त्यांच्या पत्नी सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्युनियर अमिताभ बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्या स्टाईल मध्ये कल्याणकर दाम्पत्याची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून आमदार कल्याणकर आणि सौ.संध्याताई कल्याणकर यांनी आपल्या कुटुंबाचे, आपल्या जीवनाचे आणि यशस्वीतेचे अनेक रहस्य उलगडले. प्रामाणिकपणे लोकसेवा केल्यानंतर निश्चितपणे त्याचे फळ मिळते असा विश्वासही आमदार कल्याणकर यांनी व्यक्त केला.
नांदेड शहरातील मोठे शासकीय रुग्णालय शहरा बाहेर गेल्यानंतर नांदेड शहर आणि परिसरातील रुग्णांची होत असलेली हेळसांड लक्षात घेता वाडी बुद्रुक येथे शंभर खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर करून घेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी भरभरून पाठराखण केल्यामुळे हे रुग्णालय लवकरच साकारणार असल्याचे त्यांनी सांगितले . नांदेड उत्तर वळण रस्ता मंजूर करून घेण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात हा रस्ता पूर्णहोईल आणि नांदेड शहरातील वाहतुकीवर पडणारा ताण कमी होईल असा विश्वासही आमदार कल्याणकर यांनी व्यक्त केला.
राजकीय जीवनातील यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, लोकसेवा, प्रामाणिकपणा आणि सदैव तत्परता ही तीन तत्व जपल्यास निश्चितपणे राजकारणात यश मिळते. हे तिन्ही तत्व जपत मी गेल्या अनेक वर्षापासून नांदेडकर यांची सेवा करतो आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या संपर्कात गेल्यानंतर खऱ्या अर्थाने माझे राजकीय बळ वाढले आणि राजकारणात मला यश मिळत गेले असेही आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले . यावेळी अनेक साधुसंत आणि शिवसेनेचे पदाधिकारी ,लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.