लोकसभा निवडणुकीची तयारी, भुपेंद्र यादव यांच्यावर जबाबदारी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपने मिशन २०२४ हाती घेतले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या १४१ जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. या जागा जिंकण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, बुलडाण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्यावर सोपविली आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्र्यांवर १४१ जागांची जबाबदारी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत हे मंत्री त्यांना देण्यात आलेल्या मतदारसंघांत जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतील आणि रणनीती आखतील. २०१९ मध्ये भाजपचा १४ मतदारसंघांमध्ये पराभव झाला. या जागा जिंकण्यासाठी भाजपने चार समूह तयार केले आहेत. या १४ मतदारसंघात सध्या समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसचे खासदार आहेत.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे बुलढाणा आणि औरंगाबाद मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. १९९९ पासून बुलढाण्यात शिवसेनेचा खासदार राहिला आहे. सध्या खासदार असलेले प्रतापराव जाधव २००९ पासून निवडून येत आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी सव्वा लाखाहून अधिकच्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे.
यासोबत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ सध्या एमआयएमकडे आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत एम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा जवळपास साडेचार हजार मतांनी पराभव केला. त्याआधी २००४ ते २०१९ पर्यंत खैरे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. १९८९ ते १९९६ या कालावधीत शिवसेनेचे मोरेश्वर सावे या मतदारसंघाचे खासदार होते. १९९६ मध्ये सेनेचेच प्रदीप जयस्वाल इथून विजयी झाले. त्यामुळे या मतदारसंघात सेनेचे प्राबल्य आहे.