नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने पुढील रणनीती आखली आहे. भारत जोडो यात्रेनंतर २६ जानेवारीपासून देशभरात हाथ से हाथ जोडो अभियान सुरू करणार आहे. या प्रचारासाठी पक्ष ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर जनसंपर्क करणार आहे.
ज्येष्ठ नेते पल्लम राजू हे या मोहिमेचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. १० जानेवारी रोजी विदर्भात प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची विस्तारित बैठक होणार आहे. या बैठकीत हाथ से हाथ जोडोचा राज्यव्यापी कार्यक्रम निश्चित होईल. ‘भारत जोडो’ नंतरचा हा दुसरा टप्पा राजकीय प्रचारासाठी असेल. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत.
त्या माध्यमातून विधानसभेची तयारीही केली जाईल. काँग्रेसला महाराष्ट्रात कायम उत्तम प्रतिसाद मिळत असे. त्यामुळे पक्षाने या वर्षी महाराष्ट्रावर भर द्यायचा, असे ठरवले आहे. जेथे आमदार निवडून येऊ शकतील, त्या भागावर भर दिला जाईल. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भासह अन्य सर्व भागांतील नेत्यांशी संपर्क ठेवला आहे. विदर्भावर भर देणे राजकीय फायद्याचे ठरेल, अशी आशा असल्याने कार्यकारिणी बैठक तेथे आयोजित करण्यात आली आहे. या भागासाठीचा कार्यक्रम निश्चित होईल.