कल्याण : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी पुरेसा ऑक्सिजन गरजेचा असून रुग्णालयांना तो वेळेवर उपलब्ध व्हावा, यासाठी डोंबिवलीतील मॉडर्न गॅस कंपनीकडून अंबरनाथमध्ये २० टन क्षमतेचा रिफिल प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात दिवसाला ४० टन ऑक्सिजन लागत असून तो सर्व या प्लांटवरून पुरवला जात आहे. यामुळे भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नसल्याचा दावा केला जात आहे.
सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागताच ऑक्सिजनची मागणी वाढली. यानंतर तातडीने अन्न आणि औषध प्रशासनासह आरटीओवर ऑक्सिजन नियोजन आणि पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देत रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करण्यात आला. त्याचबरोबर रुग्णालयीन ऑक्सिजन सिलिंडर भरण्यासाठी नवी मुंबई ते ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या प्रवासात जाणारा वेळ वाचावा यासाठी मागील ३० वर्षांपासून ऑक्सिजन पुरवठा व्यवसायात असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांनी अंबरनाथमध्ये २० टनांचा नवा रिफिल प्लांट उभारला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे-शरद पवार भेट; नव्या चर्चेला विषय मिळाला
चार ठिकाणी उत्पादन
राज्यात लिक्विड ऑक्सिजन उत्पादित करणा-या तळोजा, औरंगाबाद, तारापूर आणि पुणे या चार ठिकाणी कंपन्या असून तेथून उत्पादित केलेला गॅस कमीत कमी वेळेत रिफिल प्लांटपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागते. म्हणूनच अंबरनाथमधील स्वत:च्या जागेवर चौधरी यांनी सध्या ४० टन क्षमतेचा ट्रायोजेनिक लिक्विड स्टोअरेज प्लांट उभारला असून तेथून उणे १९६ अंश सेल्सियसला २५० किलो क्षमतेच्या टाक्यांमध्ये ऑक्सिजन भरून तो रुग्णालयांना पुरवला जातो.
८० टन साठा करता येणार
ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथमधील ऑक्सिजनची मागणी वाढत असून अंबरनाथमधील प्लांटमध्ये उभारण्यात आलेल्या २० टनांच्या टाकीच्या बाजूला आणखी त्याच क्षमतेच्या तीन टाक्या उभारल्या जाणार असल्यामुळे भविष्यात या प्लांटमध्ये ८० टन साठा करता येऊ शकणार आहे. याशिवाय गरजू नागरिकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार घरगुती सिलिंडरचा पुरवठाही केला जातो.