वाराणसी : ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची सोमवार दि. २३ मे रोजी वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. मंगळवारी दुपारी २ वाजता निकाल सुनावण्यात येणार आहे. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हेही सांगण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण वाराणसी कोर्टाकडे वर्ग केले होते. सुप्रीम कोर्टाने ८ आठवड्यात सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू झाली. दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयातील सर्व फायली जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात पोहोचल्या आहेत, परंतु अद्याप फायली पाहावयाच्या आहेत. दोन्ही बाजूंनी आपापल्या मागण्या मांडल्या मात्र न्यायालयाने कोणताही निर्णय न देता सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली आहे.
दोन्ही बाजूंनी आपले म्हणणे मांडले आणि न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. याप्रकरणी मंगळवारी अन्य पुरवणी याचिकांवरही विचार करण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीची प्रक्रिया काय असेल हे मंगळवारी न्यायालयाला सांगण्यात येणार आहे. याशिवाय पुढील सुनावणीची तारीखही कळवण्यात येणार आहे. हिंदू पक्षाने न्यायालयाकडे आयोगाचा अहवाल, व्हिडिओ आणि फोटोंची मागणी केली आहे.
दरम्यान, न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोरीला बॅरिकेड करून केवळ पक्षकार आणि वकिलांनाच प्रवेश दिला. सर्वेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेले न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांचेही नाव यादीत नसताना त्यांना परत पाठवण्यात आले. गेल्या सुनावणीदरम्यान अजय मिश्रा यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. न्यायाधिशांनी न्यायालयात येणा-यांची पोलिसांना यादी दिली आहे. या यादीच्या आधारे प्रवेश देण्यात आले.