नवी दिल्ली: वृत्तसंस्था
भारताच्या संरक्षणविषय धोरणाला जगातील सर्व देशांची मान्यता मिळाली आहे. आता संपूर्ण जगाला मान्य आहे की, अमेरिका आणि इस्रायलनंतर इतर कुठला देश असेल जो आपल्या सीमांचे रक्षण करु शकतो तर तो भारत आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी केले. रविवारी शाह यांची व्हर्च्युअल सभा पार पाडली, यामध्ये ते दिल्लीतून बोलत होते. यावेळी त्यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकांचे बिगूल फुंकले.
शाह म्हणाले की, एक असा काळ होता जेव्हा आपल्या हद्दीत कोणीही घुसू शकत होते. हद्दीबरोबर छेडछाड करीत होते. जवानांचे शीर कापले जात होते़ तेव्हा दिल्लीत कुठलीही संवेदना उमटत नव्हती. मात्र, आमच्या काळात उरी, पुलवामा हल्ले झाले. या काळात मोदींचे सरकार होते. काही दिवसांतच आम्ही सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकच्या माध्यमातून शत्रूंना त्यांच्या घरात घुसून मारले. त्यामुळे जगानंही मान्य केले की, अमेरिका आणि इस्रायलनंतर जर कोणत्या देशात आपल्या सीमांचे रक्षण करण्याची क्षमता असेल तरी भारतात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सीमा सुरक्षित केल्या, अशी अनेक कामे केली ज्यामुळे जगात आपल्याला सन्मान मिळाला.
Read More विषाची चारा खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज : तब्बल 15 गायींचा मृत्यू
दरम्यान, अमित शाहांच्या या व्हर्च्युअल रॅलीला राष्ट्रीय जनता दलाने जोरदार विरोध केला. राजदच्या नेत्या आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांनी भांडी वाजवून शाह यांच्या सभेला विरोध दर्शवला. तसेच प्रवाशी मजुरांच्या मुद्द्यांवरुनही त्यांनी केंद्राच्या धोरणांना विरोध केला.