नवी दिल्ली : पाकिस्तानच्या आर्थिक संकटावर संघाने सरकारला शेजार धर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल म्हणाले, उपासमारीच्या काळात भारत पाकिस्तानला १०-२० लाख टन गहू पाठवू शकतो. चित्रपट निर्माते इक्बाल दुर्रानी यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.कृष्ण गोपाल बोलत होते. संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमारही यावेळी उपस्थित होते.
कृष्ण गोपाल म्हणाले पाकमध्ये पीठ २५० रुपये किलो झाले आहे. वाईट वाटते. आपण त्यांना पीठ पाठवू शकतो. भारत त्यांना २५-५० लाख टन गहू देऊ शकतो. ते मागताच नाहीत. ७० वर्षांपूर्वी ते आपल्यासोबतच होते. ते म्हणाले, पाकिस्तान आपल्याशी भांडत राहतो. भारतासोबत ४ युद्धे झाली आहेत. हल्ला पाकिस्तानच करतो. रात्रंदिवस आपला अपमान करतात, तरीही त्यांनी सुखी राहावे अशी आमची इच्छा आहे.
सह सरकार्यवाह म्हणाले, दोन्ही देशांमधील एवढ्या दुराव्याचा फायदा काय? त्यांच्या देशात एक कुत्राही उपाशी राहू नये, अशी आमची इच्छा आहे. आपण सर्वे भवन्तु सुखिन: मानणारा देश आहोत. पाकिस्तान आपल्याकडे मागत नाही, पण भारताने गहू पाठवावा. भारताच्या भूमीवरील कोणतीही व्यक्ती, मग ती जैन, शीख, वैष्णव, आर्य समाजी असो, ते सर्वे भवंतु सुखिन: शिवाय अपूर्ण आहे.