नवी दिल्ली : आपल्या अगदी जवळच्या शेजारी देशात चीनच्या वाढत्या हालचालींना निष्प्रभ करण्यासाठी भारताने सीमेलगतच्या भागातून नेपाळमध्ये पायाभूत सुविधांत गुंतवणूक करण्याचे धोरण अंगीकारले आहे. ही रणनीती एक प्रकारे चीनला सडेतोड उत्तरच आहे. भारतविरोधी वातावरणनिर्मितीसाठी बीजिंग नेपाळ ते म्यानमार आणि बांगलादेश ते श्रीलंकेपर्यंत पायाभूत सुविधांच्या योजनांमध्ये सशर्त गुंतवणूक करून तेथील सरकारांना आर्थिक जाळयात अडकवत आला आहे.
भारत सरकारने नेपाळचे प्रवेशद्वार समजल्या जाणा-या इंटिग्रेटेड चेक पोस्टच्या (आयसीपी) आधुनिकीकरणासह नवीन पोस्ट उभारणे, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत नेपाळमध्ये आणि सीमेपर्यंत रस्त्यांचे जाळे उभारणे, पुलांची उभारणी, नवीन लोहमार्ग तयार करणे आणि वीज प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याचा आराखडा तयार केला आहे. या योजनांवर भारत १००० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करणार आहे. नागरिकांमध्ये अधिक चांगले संबंध निर्माण व्हावेत, यासाठी दोन्ही देशांच्या सीमेवरील चौक्यांचा विकास आणि नवीन चौक्यांच्या उभारणीवर भारताचा भर आहे.
दोन्ही देशांदरम्यान दळणवळणासाठी रक्सौल सीमेवरील चौकीचे महत्त्व पाहता वीरगंज (नेपाळ) येथे १३५ कोटी रुपये खर्चून सीमा चौकीची उभारणी करण्यात आली आहे. विराटनगरमध्ये अशाच पद्धतीने इंटिग्रेटेड चेकपोस्ट तयार झाल्यानंतर आता रुपईडिहा येथीही सीमा चौकीची उभारणी सुरू करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने सामरिक महत्त्व असलेल्या पाच रेल्वे लिंकही विकसित करण्याचे काम सुरू आहे. नेपाळमध्ये रस्ते तयार करण्याचे काम भारताला प्राधान्याने पूर्ण करायचे आहे. कारण चीन या हिमालयीन देशात रस्तेनिर्मितीचा डाव टाकून जनमताला प्रभावीत करू इच्छितो.
कशी आहे योजना?
– इंटिग्रेटेड चेक पोस्ट्स
बीरगंज आणि बिराटनगरमध्ये आयपीसी बनवण्यात आली आहे. नेपालगंजमध्ये रुपईडिहा आणि भैरहवामध्ये सुनौलीसारख्या चौक्यांची निर्मिती करण्यात आली.
– रेल्वेचे जाळे
जयनगर-बिजलपुरा-बर्दीबास रेल्वे लिंकच्या अंतिम भागातील सर्वेक्षण वेगात सुरू आहे. श्री रामायण यात्रा टुरिस्ट ट्रेनची सुरुवात. ५०० यात्रेकरूंचा पहिला जथ्था जनकपूरधामची यात्राही करून आला. जोगबनी-बिराटनगर रेल्वे लिंक : हा ५.४५ किमी भारतात तर १३.१५ किमी नेपाळमध्ये आहे. नेपाळ लवकरच आपल्या भागातील निर्माण करेल. भारत पूर्ण सहकार्य करेल. रक्सौल-काठमांडू ब्रॉडगेज रेल्वे लाइन : या इलेक्ट्रिक रेल्वे लाइनचे सर्वेक्षण पूर्ण. आता कोकण रेल्वे तो पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.
– रस्तामार्गाने संपर्क
त्रनेपाळच्या तराई क्षेत्रात ५०० कोटी खर्चून, ३०६ किमी लांब १० रस्ते मार्ग पूर्ण झाले आहेत. इतर १४ मार्गांचे काम वेगात सुरू आहे. त्याचेही जवळपास ९० % काम पूर्ण झाल्याची चांगली बातमी आहे.