नवी दिल्ली : सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, या पुरस्काराचा तामिळनाडू निवडणुकीशी संबंध लावला जात आहे. अशीच शंका पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आली होती. त्यावरून प्रकाश जावडेकर यांना संताप अनावर झाला. त्यांनी या प्रश्नावरून लागलीच सुनावले आहे़
चित्रपट सृष्टीत अमूल्य योगदान देणा-या ज्येष्ठ कलावंतांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. यावेळी त्यांना रजनीकांत यांना जाहीर झालेला पुरस्कार आणि तामिळनाडू विधानसभा निवडणूक यावरून प्रश्न विचारण्यात आला. तामिळनाडूमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे रजनीकांत यांना दादासाहेब पुरस्कार दिला जात आहे का?, असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाने प्रकाश जावडेकर चांगलेच संतापले. त्यांनी लागलीच त्या प्रश्नाला उत्तरही दिले. जावडेकर म्हणाले, हा पुरस्कार सिनेसृष्टीशी संबंधित आहे. पाच जणांच्या निवड समितीने एकमताने रजनीकांत यांच्या नावाची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यात राजकारण कोठून आले? प्रश्न नीट विचारले पाहिजेत, असे जावडेकर यांनी सुनावले. पुढे बोलताना जावडेकर म्हणाले, रजनीकांत हे मागील पाच दशकांपासून सिनेसृष्टीत आहेत. लोकांचे मनोरंजन करत आहेत. चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यामुळे दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने त्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. पाच सदस्यीय निवड समितीने एकमताने हा निर्णय घेतलेला आहे.