नवी दिल्ली : भारत सरकारच्या मालकीची असलेली आणि देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीची अदानी समूहातील गुंतवणूक धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. एलआयसीने अदानी समूहातील कंपन्यांमध्ये ३०,१२७ कोटींची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीचे मूल्य २४ जानेवारी रोजी ८१,२६८ कोटी रुपये इतके झाले होते. मात्र, मागील महिनाभरापासून अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण होत आहे. त्याचा परिणाम एलआयसीच्या गुंतवणुकीवर झाला आहे.
अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या संशोधन अहवालानंतर अदानी समूहातील लिस्टेड कंपन्यांचे शेअर दर ८० टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी समूहात एलआयसीने केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य आता ३३,१४९ कोटी रुपये इतकेच राहिले आहे. याचाच अर्थ एलआयसीच्या गुंतवणुकीवरील नफा जवळपास ३ हजार कोटी रुपयांचा झाला आहे. अदानी समूहाच्या शेअर दरात अशीच घसरण कायम राहिल्यास एलआयसीची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.
एलआयसीने ३० जानेवारी रोजी अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये ३०,१२७ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे जाहीर केले होते. २७ जानेवारी रोजी या गुंतवणुकीचे मूल्य ५६,१४२ कोटी रुपये होते. डिसेंबर तिमाहीच्या तिमाही शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार एलआयसीने अदानी समूहाच्या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. यामध्ये एसीसी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोटर््स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अंबुजा सिमेंट्स यांचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार एलआयसीची एकूण मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन ४१.६६ लाख कोटी रुपये होती. एलआयसीने म्हटले होते की, अदानी समूहातील त्यांची गुंतवणूक त्यांच्या एकूण एयूएमच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे.