नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांना शेतक-यांच्या विरोधात अजूनही सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतक-यांनी सरकारचा चर्चेचा प्रस्तावही फेटाळून लावला आहे. त्यात आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतक-यांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते़ त्यांनी उत्पन्न दुप्पट केले हे खरे आहे. पण शेतक-यांचे नव्हे, तर अदानी आणि अंबानी यांचं उत्पन्न दुप्पट केले, अशी घणाघाती टीका राहुल यांनी केली आहे. यासोबतच जे लोक हे काळे कृषी कायदे कसे योग्य आहेत अशीच दवंडी पिटत आहेत ते शेतक-यांच्या मुद्यावर काय तोडगा काढणार?, असे म्हणत राहुल यांनी सरकारच्या चर्चेच्या प्रस्तावावर टीका केली.
दिल्ली चलो आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने निघालेले हजारो शेतकरी अजूनही सिंधू सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. सरकारने आंदोलक शेतक-यांना बुराडी मैदानात आंदोलन करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र शेतक-यांनी सरकारच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवत दिल्लीच्या सीमेवरच आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. जोवर सरकार कृषी कायदे मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार शेतक-यांनी केला आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील शेतकरी देखील दिल्लीत प्रवेश करण्यासाठी दिल्ली-गाजीपूर सीमेवर जमा झाले आहेत.
अमित शहांचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला