श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील २५ हजार कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्लांबरोबरच २०० जणांची नावे समोर आली आहेत. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यूटी ऍडमिनिस्ट्रेशन आणि सीबीआयने आतापर्यंत केलेल्या तपासात ही बाब उघड झाली आहे.
तपासानूसार अब्दुल्ला यांनी १९९८ साली जम्मूमधील संजवानमध्ये तीन वेगवेगळ्या लोकांकडून तीन कनाल (१०११.७१ स्वेअर मीटर) जमीन विकत घेतली. त्यानंतर त्यांनी जंगलाचा भाग असणा-या सात कनाल (३५४१ स्वेअर मीटर) जमिनीवरही ताबा मिळवून घर बांधले.
सीबीआयच्या तपासानूसार फारुक अब्दुल्ला यांनी जम्मू आणि श्रीनगर येथे रोशनी कायद्याअंतर्गत जमीन उपलब्ध करुन दिली तर त्यांची बहीण सुरैया मट्टू यांनाही या कायद्याच्या आधारे आर्थिक लाभ देणारे निर्णय घेतले. अब्दुल्ला यांच्या जवळच्या व्यक्तींनीही संजवान परिसरामध्ये वन आणि सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवला. यामध्ये नेते सय्यद अली अखून यांच्या नावाचा समावेश आहे.
रोशनी घोटाळा नक्की काय?
२००१ मध्ये रोशनी कायदा तयार करण्यात आला. या कायद्यानुसार बेकायदेशीरपणे जमिनीवर मालकी सांगणा-यांना ठराविक रक्कम भरल्यानंतर त्या जागेचा मालकी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कायद्याच्या आडून राज्यातील अनेक मोठ्या व्यक्तींनी हजारो कोटींच्या जमिनी आपल्या नावावर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सध्या सीबीआय चौकशी करत असून हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे.
शेतकरी संघटनेने ठाळे ठोकताच शेतकऱ्यांना मिळाले पैसे