पाटणा : जेडीयूचे नेते नितीशकुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी निवड करण्यात आली असून, सोमवार दि़ १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११़३० वाजता नितीशकुमार सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. रविवार दि़ १५ नोव्हेंबर रोजी एनडीएच्या नेतेपदी नितीशकुमार यांची निवड झाल्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सोमवारी सकाळी ११.३० वाजता शपथविधी पार पडणार असून, यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नितीश कुमार सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. एनडीएची बैठक आज पार पडली असून, त्यानंतर नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. भाजपाला जास्त जागा मिळाल्याने नितीश कुमार यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद निसटणार असल्याची शक्यताही वर्तवली जात होती.
भाजपा नेत्यांनी एकीकडे नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असे स्पष्ट केले असताना नितीश कुमार यांनी मात्र मौन बाळगले होते़ यासोबतच आपण मुख्यमंत्रीपदावा दावा केला नसल्याचेही म्हटले होते़ पण अखेर एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करत चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.
एनडीएतील सर्व घटक पक्षांची बैठक संपन्न
बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासंबंधी भाजपा, जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) यांची नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.
एनडीएचे पक्षीय बलाबल कसे?
बिहारमध्ये एनडीएने १२२ जागांसहित बहुमत मिळवले आहे. भाजपाला ७४ जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे २०१५ मध्ये ७१ जागा मिळाल्या होत्या तिथे यावेळी ४३ जागांवरच विजय मिळवता आला. भाजपाच्या जागा मात्र ५३ वरुन ७४ वर पोहोचल्या. यासोबत भाजपा बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला.
आर्मेनियावासी स्वत:च लावतायेत घरांना आगी