गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपण पूर्णत: डिजिटल होण्याकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. कागदांचा वापरही पूर्णपणे बंद केला पाहिजे. स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्षाकडे पाहता आपण हे लक्ष्य साधले पाहिजे, असेही ते म्हणाले.
संविधानदिनानिमित्त गुरुवारी गुजरातमधील केवडिया येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच ही जखम आपण कधीही विसरू शकणार नसल्याचे ते म्हणाले. संविधानाच्या संरक्षणात न्यायपालिकांची भूमिका महत्त्वाची आहे. ७० च्या दशकात ते भंग करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु संविधानाने त्याचे उत्तर दिले.
आणीबाणीनंतर यंत्रणा अधिक मजबूत होत गेलली आणि आपल्याला खुप काही शिकायलाही मिळाले, असेही त्यांनी नमूद केले. प्रत्येक नागरिकाला संविधान समजून घेण्याची गरज आहे. संविधानाच्याच मार्गाने सर्वांनी चालले पाहिजे. लोकांना केवायसी म्हणजेच ‘नो युअर कॉन्स्टिट्यूशन’वर भर देणे आवश्यक आहे. विधानसभेच्या चर्चांदरम्यान जनतेचा सहभाग कसा वाढेल, यावर विचार केला गेला पाहिजे. जेव्हा कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होते, तेव्हा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही बोलावण्यात आले पाहिजे, असेही पंतप्रधान म्हणाले.
दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे नाहीच