पुदूचेरी : पुडुचेरीमध्ये काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यानंतर पुडुचेरीतील सरकारल कोसळले. पुडुचेरी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी उपराज्यपालांना आपला राजीनामा सोपवला. रविवारी दोन आमदारांनी आपला राजीनामा दिल्यानंतर पडुचेरीमध्ये राजकारण तापले होते़ पुडुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून किरण बेदी यांना हटविताना त्याचा काँग्रेसला फायदा मिळू नये, अशी व्यवस्था मोदी सरकारने केली होती.
राज्यातील काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामे दिल्याने नारायणस्वामी सरकार अल्पमतात आले होते़ किरण बेदी यांनीच हे घडवून आणले, अशी टीका काँग्रेस करत होती. त्यामुळे लवकरच होणा-या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला सहानुभूती मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. याच कारणामुळे बेदी यांना हटवून काँग्रेसच्या पायाखालची चादर भाजपने काढली. गृहमंत्री अमित शाह यांनी योग्य वेळी ही खेळी केली.
सहानुभूती मिळणे कठिण
किरण बेदीच पदावर नसल्यानं काँग्रेसला सहानुभूती मिळणं अवघड होईल. राज्यात निवडणुका असल्याने राहुल गांधी यांनी काही दिवसांत तेथील नेत्यांशी दिल्लीत चर्चा केली. विश्वासातील नेते दिनेश गुंडू राव यांच्याकडे पुडुचेरीची जबाबदारी सोपविली. राहुल गांधी बुधवारी पुडुचेरीच्या दौ-यावर असल्यानं त्याआधी एक दिवस बेदी यांना दूर करण्यात आले.
बेदींना दूर करण्याची होती मागणी
सरकारच्या कामात निष्कारण हस्तक्षेप करणा-या, सरकारला काम करू न देणा-या किरण बेदी यांना दूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी सातत्याने केली होती. भाजपने पुडुचेरी निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल व राजीव चंद्रशेखर यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत हा केंद्रशासित प्रदेश ताब्यात घेण्याचा अमित शहा व जे. पी. नड्डा यांचा प्रयत्न आहे.
काय आहे राजकारण?
तेलंगणाच्या राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांच्याकडे काही काळासाठी पुडुचेरीची जबाबदारी सोपवण्यातही राजकारण आहे. तामिळ भाषकांच्या पुडुचेरीत मूळ तामिळनाडूच्या सौंदरराजन काम पाहतील. नारायणस्वामी यांच्याप्रमाणेच सौंदरराजन याही नाडर समाजाच्या आहेत.
हा तर राजकीय वेश्या व्यवसाय : मुख्यमंत्री
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या दौ-यानंतर काही दिवसांतच काँग्रेसवर ही वेळ आली आहे. बंडखोर आमदारांमुळे पुद्दुचेरीत काँग्रेसला हातची सत्ता गमवावी लागली असल्याने मुख्यमंत्री नारायणसामी यांनी संताप व्यक्त केला आहे. बहुमत ठराव मांडण्याआधी नारायणसामी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतानापुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली होती.
सावधानता बाळगा अन्यथा कोरोना पुन्हा येईल; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा इशारा