नवी दिल्ली : शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेमध्ये मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन केले. सर्व सदस्य देशांना परस्परांच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचा सल्ला देत त्यांनी चीन आणि पाकिस्तानला कठोर संदेश दिला.
द्विपक्षीय मुद्द्यांची चर्चा नको
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या शिखर परिषदेला मोदी यांनी संबोधित केले. शांघाय सहकार्य संघटनेच्या देशांसोबत भारताचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध आहेत. पुढे जाताना आपण परस्परांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे.द्विपक्षीय मुद्दे एससीओ च्या अजेंड्यावर आणण्याचा अनावश्यक प्रयत्न केला जातो, हे दुर्देवी आहे. एससीओ च्या नियमांचे हे उल्लंघन आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या व्हर्च्युअल परिषदेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आमने-सामने आले आहेत.
मे महिन्यापासून पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. दोन्ही देशांच्या लष्करी पातळीवरील चर्चेच्या अनेक फेरी होऊनही चीनकडून मुजोरी चालू आहे. दुसरीकडे पाकिस्तानकडूनही सीमेवर शस्त्रसंधीचा भंग केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दोन्ही देशांना योग्य भाषेत संदेश दिला.
दहशतवाद व कोरोनानंतरच्या अर्थव्यवस्थेवरही चर्चा
कोरोना विषाणूच्या संकटामुळे यंदा शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद व्हर्च्युअली आयोजित करण्यात आली आहे. दहशतवादाचा वाढता धोका आणि कोरोनाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम या मुद्यांवरही प्रामुख्याने बैठकीत चर्चा होईल.
नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार