नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच, केवळ एकाच ठिकाणी चित्तांचा बंदोबस्त करणे योग्य होणार नाही असे म्हणत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला खडसावले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातून आलेल्या चित्यांंपैकी तिस-या चित्याचा मृत्यू झाला आहे. भारतात २० चित्ते आणण्यात आले होते. दोन महिन्यात तीन चित्त्यांचा मृत्यू झाल्याने सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेली मादी चित्ता भारत सरकारने का स्विकारली? असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला आहे. न्यायमूर्ती गवई म्हणाले की चित्ते ब-याच -याच काळानंतर भारतात आणले गेले. त्यांना एकाच ठिकाणी ठेवल्यास प्रत्येकाला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांचा पर्यायी अभयारण्यात बंदोबस्त करण्याचा विचार व्हायला हवा. मग ते मध्य प्रदेशातील अभयारण्यात किंवा राजस्थान, महाराष्ट्रातील अभयारण्यात.
केंद्र सरकारने मांडली भूमिका
३ चित्त्यांच्या मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू आहे. मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिल्याचेही सरकारने सांगितले. चित्ता प्रकल्पाचे हे मोठे यश आहे. कुनोच्या वातावरणात चित्ते आरामात राहतात. एका चित्त्याचा आजाराने मृत्यू झाला. तर इतरांचा मारामारीत जखमी होऊन मृत्यू झाल्याचेही सरकारने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान स्पष्ट केले.
नामिबियातून चिते भारतात
गेल्या वर्षी म्हणजे २०२२ च्या सप्टेंबर महिन्यात नामिबियातून विशेष विमानाने चित्यांना भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर ग्वाल्हेरमधून चित्यांना हेलिकॉप्टरनं नेण्यात आले. तिथून चित्त्यांची कुनो नॅशनल पार्कामध्ये रवानगी करण्यात आली.