नवी दिल्ली : देशात सध्या पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असून, अनेक राज्यांमध्ये पुन्हा उद्रेक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून महाराष्ट्रासह चार राज्यांना सद्य परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.कोरोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू,मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने यावेळी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
दोन दिवसांत अहवाल द्या
चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिल्लीतील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या याचा अहवाल दिल्ली सरकारने दाखल करावा, असेही निर्देश न्यायालयाने दिल्लीचे महाधिवक्ता संजय जैन यांना दिले.
केंद्र व राज्याचे एकत्रित प्रयत्न आवश्यक
वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सर्वच राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आम्ही ऐकत आहोत. त्यामुळे सर्व राज्यांनी सद्यपरिस्थितीचा अहवाल सादर करावा. राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य तयारी केली नाही, तर डिसेंबरमध्ये परिस्थिती यापेक्षाही भयंकर होऊ शकते. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि रुग्णांच्या हाताळणीसंदर्भात राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
चीनविरोधात जमिनीखालून चक्रव्युह