नवी दिल्ली : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी करणारी याचिका रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका सुनावणीसही न घेण्याचा निर्णय घेऊन त्यांना दणका दिला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून सुरु आहे.याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अर्णब यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन जामिन मिळवण्यात यश मिळविले होते. त्यानंतर काही दिवसांपुर्वी अर्णब यांनी महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास दाखवित या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रिपब्लिक वाहिनी तसेच तिच्या कर्मचा-यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. त्याची सुनावणी सोमवारी न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर झाली.
न्यायालयाने रिपब्लिकविरोधात दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीलाही नकार दिला. याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना स्थानिक न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.
याचिका महत्त्वाकांक्षी असल्याचा ठपका
न्यायमुर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी याचिकेच्या हेतूवर मार्मिक टिप्पणी केली. ही याचिका महत्त्वाकांक्षी असल्याचे दिसत आहे. आपली इच्छा आहे की, महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचा-याला अटक करू नये. त्याचबरोबर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात यावे. मात्र यात हेच चांगले होईल की, आपण ही याचिका मागे घ्यावी, अशा शब्दात न्यायालयाने अर्णब यांचे वकील मिलिंद साठे यांची कानउघडणी केली. न्यायालयाच्या कानउघडणीनंतर अखेर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली. दाद मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात जाण्यास न्यायालयाने परवानगी दिली.
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला सापडली ५ किलो स्फोटके