पुढील ३० ते ४० वर्ष राहणार भाजप युग
राष्ट्रीय कार्यकारिणीत अमित शहांचे वक्तव्य
हैदराबाद : पुढील ३० ते ४० वर्षे भाजपचा काळ असेल आणि या काळात भारत विश्वगुरू बनेल. घराणेशाही, जातीयवाद आणि तुष्टीकरण हा देशाच्या राजकारणासाठी मोठा शाप आहे, जो देशासमोरील समस्यांना कारणीभूत आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
अमित शहा यांनी हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यावर भाष्य केले. तेलंगण आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये भाजप कौटुंबिक राजवट संपवेल आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशासह इतर राज्यांमध्ये सत्तेतही येईल, असे अमित शहा म्हणाले. २०१४ पासून केंद्रात सत्तेत असलेला भाजप या राज्यांमध्ये मात्र सत्तेत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे शहा म्हणाले. यामध्ये दिवंगत खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाफीया जाफरी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती.
याचिकेत गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलींमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ लोकांना एसआयटीने दिलेल्या क्लिन चीटला आव्हान देण्यात आले होते. मोदी यांनी दंगलीमध्ये आपल्या कथित भूमिकेबाबत एसआयटी तपासाचा सामना केला होता आणि संविधानावर आपला विश्वास कायम ठेवला होता असे शहा म्हणाले.