नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीने नोटीस पाठवली असून चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर काँग्रेस चांगलीच संतापली असून काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
ईडीने सोनिया गांधी यांना ८ जून रोजी हजर राहण्याचे निर्देश दिलेत तर राहुल गांधी यांना २ जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे नेते ईडीसमोर कधी हजर होतील याची माहिती दिली. राहुल आणि सोनिया गांधी हे दोघेही ८ जून रोजी हजर राहतील. सोनिया गांधी तर हजर होतीलच पण राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. ते जेव्हा भारतात परततील तेव्हा त्यानुसार ईडी चौकशीची तारीख ठरवेल, अशी माहिती अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नॅशनल हेरॉल्डचा मुद्दा वारंवार उपस्थित करून भाजप स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करत आहे. ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काहीही सहभाग नाही. नॅशनल हेरॉल्ड हे वर्तमानपत्र १९४२ मध्ये सुरु झाले होते. त्यावेळी ब्रिटिंशांनी त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश सरकारप्रमाणेच मोदी सरकारही काम करत आहे अशा शब्दांत सुर्जेवाला यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ज्या प्रकरणात कुठलाच आर्थिक घोटाळा झालेला नाही त्याच आर्थिक गैरव्यवहाराची केस चालवण्यात येत आहे. याद्वारे भाजपकडून सूडाचे राजकारण, भीती आणि खालच्या दर्जाचे राजकारण करण्यात येत आहे.